कुल पेज दृश्य

बुधवार, 12 अक्टूबर 2016

सीमोल्लंघन

लोकमत सखी मधला माझा लेख!
आजचा दिवस सीमोल्लंघनाचा ! विचारांच्या जागराचा ! मागे वळून पाहण्याचा ! सीमोल्लंघनाकडे नव्या नजरेनी पाहण्याचा ! नवरात्र सुरू झालं की मला आठवण येते माझ्या लहानपणीची. त्या काळात घरात पाय ठरायचाच नाही आम्हा मुलींचा! संध्याकाळ झाली की वेध लागायचे भोंडल्याचे. नटूनथटून एका घरातून दुसऱ्या घरात जाताना आम्ही साऱ्याजणी उत्साहानं नुसत्या चिवचिवत असायचो. अंगणात गडद रंगाच्या पाटावर पांढऱ्याशुभ्र रांगोळीनं सुबक हत्ती रेखलेला असायचा. त्याच्याभोवती फेर धरत, हातात हात गुंफत भोंडल्याची गाणी चढाओढीनं म्हटली जायची आणि मग खिरापत ओळखण्यासाठी केलेला दंगा. दसऱ्यापर्यंत आम्ही पूर्ण गल्ली आणि ती ओलांडून अनेक ठिकाणी भोंडला खेळायचो. दसऱ्याच्या दिवशी घरातले पुरुष सीमोल्लंघन करून यायचे, मग गव्हातांदळाचा चौक मांडला जायचा. आम्ही लहान मुलं आणि पुरुष मंडळी त्यात बसायचो. मग औक्षण केलं जायचं. आपट्याची पाने एकमेकांना द्यायचो. एकूण धम्माल वाटायची !
हळूहळू भोंडल्यांच्या गाण्यांमधल्या शब्दांच्या गमती ओलांडून त्यातल्या अर्थांचा विचार सुरू झाला. ज्या काळात ही गाणी रचली गेली, त्या काळात मुलींची लग्न लवकर होत असायची. चिमुकल्या सासुरवाशिणी अशा सणांच्या निमित्तानं आपल्या समवयस्क सखींशी हितगूज करायच्या, मन मोकळं करायच्या. माजघराचा उंबरठा ओलांडून बाहेरच्या जगात हे सणच तर त्यांना घेऊन जायचे.
माजघरातून बाहेर येत अंगणाची कुंपणं ओलांडून बाहेरच्या जगात बाई आली. हळूहळू अनेक क्षेत्रांमध्ये तिनं प्रवेश केला. यशाची शिखरं काबीज केली. अगदी पुरुषी वर्चस्वाच्या मानल्या गेलेल्या क्षेत्रातही तिनं आपला ठसा उमटवला. फक्त विजयादशमीच्या मुहूर्तावरच अवलंबून न राहता सीमोल्लंघन तिनं खऱ्या अर्थानं केलं प्रत्येक क्षणाला ! काळानुसार ती बरीच बदलली. तिच्या कपड्यांमध्ये, राहणीमानात बदल झाला.
कपड्यांमध्ये आधुनिकता आली पण काही वेळा ती अजूनही मागेच राहिलीये हे बऱ्याच वेळा जाणवतंय. एका कार्यक्रमाची आठवण मला दरवेळेस हटकून येते. समाजात ठसा उमटवणाऱ्या काही महिलांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम चालू होता. पुरस्कार वितरण ज्यांच्या हस्ते होतं त्या बाई वयाच्या साडेसतराव्या वर्षी विधवा झालेल्या. पदरात तान्ही मुलगी. दुःखाचा डोंगर कोसळला पण त्या हिमतीनं उभ्या राहिल्या. छोट्या मोठ्या नोकऱ्या करत परीक्षा दिल्या. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करून नाव कमावलं. मुलीला उच्च शिक्षण दिलं. नंतर समाजाचं देणं फेडण्यासाठी काम सुरू केलं. कुणीही त्यांच्यापासून हिंमत घ्यावी असं हे व्यक्तिमत्व. कार्यक्रमात पुरस्कार मिळालेल्या बाईला आधी कुंकू लावून मग सत्कार असं स्वरूप होतं. एका बाईनं त्यावेळेस यांना हातानं थांबवलं आणि भर कार्यक्रमात तुम्ही मला कुंकू लावायचं नाही असं सांगितलं. सगळे अवाक् होऊन बघतच राहिले. इतक्या दुखावल्या गेल्या त्या बाई अशा असमंजस वागण्यानं! त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पुढे भाषण करताना. अशा अनेक कार्यक्रमात एक बाई म्हणून आपण दुसऱ्या बाईवर अन्याय करतो आहोत असा विचार चुकूनही येत नसेल का मनात? त्या कार्यक्रमात मी मात्र मनोमन निश्चय केला, की जिथे बाईचा तिला नवरा असण्यानसण्यावरून अपमान केला जातो असा हळदीकुंकू समारंभ मी कधीच करणार नाही.
खरंतर बाईपण किती दिमाखाचं, सृष्टीच्या जवळचं ! आदिमायेचं रूप म्हणजे बाईपण. एकीकडे देवी म्हणून पूजा करायची आणि दुसरीकडे किती भिंती? जातीधर्माच्या, उच्चनीचतेच्या, वर्ण- वर्गभेदाच्या, रंगरूपाच्या, श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या. नवरा मेला म्हणून, घटस्फोट झाला म्हणून, मूल नाही म्हणून, फक्त मुलीच झाल्या म्हणून, अशा अनेक कारणांवरून आजही समारंभात, सार्वजनिक ठिकाणी, घरात बाईचा अपमान केला जातो. अनेक धार्मिक कार्यक्रमात तिला डावललं जातं. हे सोसणारी बाई मनातून खूप खचून जात असते हे आपण कधी समजून घेणार? या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून तिचा विचार केला पाहिजे, तिचा स्वभाव, तिचे गूण, तिचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे हे आपण कधी लक्षात घेणार? विचारांच्या या सीमा आपण कधी ओलांडणार?
आपण स्वतःचा कसा विचार करतो, स्वतःला न्याय देतो का? इतरांसाठी धडपडून कष्ट करताना स्वतःवर पण प्रेम करतो का? हे सतत तपासलं पाहिजे. त्याचबरोबर एक बाई म्हणून दुसऱ्या बाईवर आपण कळतनकळत अन्याय करत नाही ना हेही बघितलं पाहिजे. देवीच्या नावावर एकीकडे उपवास करायचे आणि दुसरीकडे तिच्या रुपात असलेल्या जिवंत बाईला वाईट वागवायचं. पूजेच्या नावावर आपण करत असलेल्या कामांमध्ये कुचराई करायची हे नाही ना योग्य ! ज्या काळात धार्मिक रूढी परंपरा निर्माण झाल्या त्या वेळची सामाजिक स्थिती वेगळी होती, गरज वेगळी होती. विशिष्ट उद्देशानं त्या निर्माण झाल्या. पण आता काळ किती बदलला आहे ! जुन्या परंपरांचा नव्यानं विचार केला पाहिजे. आताच्या काळाशी त्या सुसंगत आहेत का हे बघितलं पाहिजे. कालबाह्य झालेली कर्मकांडे कशाला करत राहायची? यासाठी त्यांचा अभ्यासही केला पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि उत्तरंही आपणच शोधली पाहिजेत.
कुटुंब, मुलं यांचा विचार करताना आवश्यक ती स्पेस आपल्या नात्यांना मिळाली पाहिजे. आपल्या घरात आपल्या मुलांना खऱ्या अर्थाचं विचारांचं मोकळेपण मिळालं पाहिजे. पारंपारिक चौकटींच्या पलीकडे जाऊन मुलांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्याविषयी कृतज्ञता मनात असली पाहिजे. जमेल ते छोटं मोठं सामाजिक काम केलं पाहिजे. समाजोपयोगी नवीन उपक्रम सुरू केले पाहिजेत. निसर्गस्नेही जगता आलं पाहिजे. पर्यावरणाला ओरबाडत आपलं सुखं मिळवत राहणं कोणत्या संस्कृतीत बसतं? आपली संस्कृती तर निसर्गाच्या जवळ राहण्याची, त्याच्याशी कृतज्ञ राहण्याची शिकवण देते.
सर्व भेदांच्या सीमा ओलांडून आयुष्य जाणीवपूर्वक, अर्थपूर्ण जगणं, त्यासाठी नवनवे अनुभव घेत राहणं हे फार महत्वाचं आहे. यानं जगण्याला अर्थ मिळतो. माणसांना भेटणं, पुस्तकं, कार्यक्रम, निरनिराळे उपक्रम यातून नवीन शिकणं होतं, जे आपल्याला समृद्ध करतं. असं विचारांनी समृध्द होणं जास्त महत्वाचं. आपल्याच कर्मठ, जुनाट विचारांना प्रश्न विचारत सध्याच्या काळाशी सुसंगत असा नवीन विचार करायला लागणं आणि त्याप्रमाणे कृतीही करत राहणं हे खऱ्या अर्थाचं सीमोल्लंघन ठरेल. यासाठी हे आदिशक्तीच्या रूपा, तुला खूप खूप सदिच्छा !

 -स्मिता पाटील
smita.patilv@gmail.com

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें