कुल पेज दृश्य

शुक्रवार, 25 मई 2012

क्षण क्षण

तुझा अनिवार स्पर्श 
माझा उभा देह 


कापराचा...

तुझे हळुवार शब्द 
माझा क्षण क्षण 


गोठण्याचा...

बुधवार, 23 मई 2012

बयो

तसं सर्वार्थानं आपलं असं
कुणीच नसतं ना बयो, 
जे सोबत असतं आपल्या 
काळीज उलताना, फुलताना...
आतड्यांमधून उठणाऱ्या 
कल्लोळांना 
स्वतःलाच बांध घालावा 
लागतो बयो.
आतून उगवणाऱ्या 
हिरव्या जखमांवरची 
निळीशार फुंकर 
आपली आपणच 
व्हावं लागतं बयो,
स्वतःशीच लढताना.
शिकशील तूही हळूहळू.
पण तोपर्यंत नव्यानं
फुटशीलही.
सोपं नसतंच काही 
पण तितकं अवघडही नसतं काही तसं,
ज्यासाठी करावा लागतो
प्राणांचा अट्टाहास असं...
निरगाठी उकलाव्यात तसं 
आयुष्यही उलगडत जातं मग हळूहळू 
समंजसपणाच्या तीरावर...
                         - स्मिता.

शुक्रवार, 18 मई 2012

हळवी ओंजळ

'अन्न, वस्त्र, निवारा 
याच माणसाच्या मुलभूत गरजा 
आणि चालणारा श्वास हेच अंतिम सत्य ,
बाकी सगळं झूठ!'
तुम्ही म्हणालात ठामपणानं.

हो कबूल,
पण श्वासांइतकंच आणि 
श्वासांपलीकडेही 
महत्त्वाचं असतं ना खूप काही,
जे रुजतं हिरव्यागार सळसळीतून,
उसळतं बेभान लाटांमधून,
मगतं दूर दूर चालत जाणाऱ्या,
लाल, करड्या पाऊलवाटांमधून,
हुरहुरतं गच्च गच्च स्पर्शातून,
मावळतं कुणाच्या तरी वियोगातून.
असतं महत्त्वाचं खूप काही,
मीही म्हटलं ठामपणानं.
तर तुम्ही उगारलात आसूड छद्मी हास्याचा
अन मांडत राहिलात आपलाच मुद्दा
दुराग्रहानं, त्वेषानं...
अनेक स्वप्नभरल्या डोळ्यांना
हिणवत राहिलात तुम्ही अनंत काळ...
पण आता मीही ठाम
नाही पटवून द्यायचं
तुम्हाला काही पुन्हा पुन्हा,
या मुद्द्यावर!
दगडावर माथा आपटताना,
रक्तबंबाळ होणं
टाळायला शिकलं पाहिजे,
या मुद्द्यावर!

श्वासांपलीकडच्या आणि श्वासांइतक्याच
महत्त्वाच्या खूप काही गोष्टींसाठी
असावी लागते आपल्याजवळ एक हळवी ओंजळ...
ती तर नाही ना हिरावून घेऊ शकत 
कुणी आपल्यापासून?
आता मीही ठाम या मुद्द्यावर!!!!
                  - स्मिता.

शुक्रवार, 30 मार्च 2012

ऐना बिलोरी

आयुष्य 'भोग'ताना सुखाचे
गाणे म्हणावे लागते
जपत उन्हालाही कधी
चांदणे म्हणावे लागते !!

चेहरा स्वतःचा जेव्हा
अचानक परका परका
वाटेतल्या काचांना
ऐना बिलोरी बनावे लागते !!

कधी कुणाच्या दारावरुनी
सांज उदासून जाता
चांदणे ओंजळीत घेताना
उरी फुटावे लागते !!
                           - स्मिता  

शनिवार, 4 फ़रवरी 2012

अस्वस्थ कहाणी

तुझ्या माझ्या संदर्भातले 
सगळे ऋतू नादावतात मला...
तसे तर चिंब चिंब श्रावणधारांमध्ये 
वैशाखवणवा होऊन जळण्याचे प्राक्तनही
तूच तर दिलेले असते मला 
आयुष्यभरासाठी आंदण म्हणून...

उदबत्ती जळताना 
सुगंध उधळते आसमंतात 
माणसासाठी, देव म्हणून असलेल्या 
त्याच्या श्रद्धेच्या प्रतीकासाठी.
मागे राहिलेली राखच नसते कुणाची,
कुठल्या वासाची!
अंगारा म्हणूनही कधी भाग्य नसते तिचे!
पण जळताना ती उधळून देते
आपले सुगंधीपणाचे सारे आविष्कार...

जळण्याचे उदबत्तीचे भाग्य दिल्याबद्दल 
आभार मानायचे आहेत तुझे
पण शब्दच सापडत नाहीयेत...
असं कर, 
भिजल्या अंतराचे 
थोडे हळवे स्पर्शच घेऊन जा.
ते सांगतील तुला अनंत जन्मांची,
जळण्या- उरण्याची, 
उधळून दिलेल्या सुगंधाची 


अस्वस्थ कहाणी...
                           -स्मिता  

बुधवार, 25 जनवरी 2012

ही कुठल्या जन्माची अस्वस्थता

ही कुठल्या जन्माची 
अस्वस्थता 
भरून राहिलीये
अवघ्या नसानसांत 
की जिचा उगमच
कळत नाहीये 
आणि शांतवणारा अंतही?
हे कुठले अज्ञात झरे
वाहताहेत आतून 
अंतरातले कुठले स्त्राव
कुण्या जन्माचे?
की ज्यांच्याविना
अपूर्णच राहिलं असतं
जगणं की पुन्हा पुन्हा
मरून उरणं?
                                       -स्मिता.

समजुतीच्या वाटेवर

समजुतीच्या वाटेवरचा माझा प्रवास 
नक्की कधीपासूनचा?
पण जाणिवेच्या लख्ख प्रदेशातलं
पहिलं गाव तर तुझंच...
आणि मग गावं बदलत गेली,
माणसं वाढत गेली.
प्रवास अजूनही चालूच!
आता जीव थकलाय 
अन वाट सरता सरत नाहीये.....
                            -स्मिता.