कुल पेज दृश्य

शनिवार, 10 फ़रवरी 2018

इतके कसे तुटत जातो आपण
आपल्याच भवतालापासून?
जे जोडून ठेवण्याचा
केलेला असतो प्रयत्न प्राणपणानं.
खटकलेल्या कित्येक गोष्टी
मनाआड करून,
सांधलेली असतात
अनेक नाती लांबची जवळची!
संबंधांच्या साऱ्या अट्टाहासांचा अहं
कुरवाळलेला असतो हसत हसत;
स्वतःच्या अगणित इच्छांचा,
स्वप्नांचा बळी देऊन.
कधीतरी लक्षात येतोच
या सगळ्यातला फोलपणा.
कशासाठी आटापिटा केला आपण
जीव नसलेल्या नात्यांसाठी?
ज्यांना नको होतं त्यांना
कशासाठी वाटत राहिलो प्रेम?
आदर्श नारी, सुपरवूमन...
हव्याच होत्या का या बिरुदावल्या
निखळ जगण्यासाठी?
कशासाठी सिद्ध करत राहिलो स्वतःला,
पुन्हा पुन्हा जखमी होत?
त्वचा सोलवटून घेतली तरी
नाही मिळत काही उत्तरं कधीच.
बयो,
हे कळतं ना तेव्हा
बदललेलं असतं खूप सारं!
आपण मरत गेलेलो असतो हळूहळू
अनेक निकषांवर स्वतःला घासताना
जखमाच जखमा दिसायला लागतात
आणि लाल लाल ओघळ डोळ्यातले!
बयो, तेव्हा एकच करायला हवं,
थांबायला हवं,
एक रेषा ओढायला हवी
आपल्याचभोवती,
स्वतःला कधीतरी
न्याय देता यायला हवा
केवळ याचसाठी!
- स्मिता